त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.
मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले.
शिमोन (ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन,
याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत.
येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता;
तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते.
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले,
“अहो दीनांनो, तुम्ही धन्य;
कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात
ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही तृप्त व्हाल.
अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही हसाल.
मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.
त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात.
अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्हांला भूक लागेल.
अहो, जे तुम्ही आता हसता
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.
परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा;
जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस.
जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्याकडे ते परत मागू नकोस.
लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.
जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणार्यांवर प्रीती करतात.
जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात.
ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात.
तुम्ही तर आपल्या वैर्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.
जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.
तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल;
द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”
त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही?
शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.
तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही; तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही.
प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत.
चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही?
जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो.
तो कोणाएका घर बांधणार्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते.
परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”